Monday 10 May 2010

जगजीत..

 परवा  जगजीतच्या  कॉन्सर्टला गेलो होतो.जगजीत म्हणजे मनाची शांतता...असा हिशोब आहे माझा.त्याच्या संथ,हळुवार आवाजाने मनही शांत होते.आणि त्यातल्यात्यात एकसे एक गझल त्याने सादर केल्या.त्याचा वादक संघ सुद्धा भन्नाट होता.बासरीवादन खूपच सुंदर होते."कौन केहता ही मुहब्बत कि जुबा नही होती.."या गझलने जोरदार सुरवात केली.....प्रेक्षकांनी भरपूर आस्वाद घेतला.शेवटी तर त्याने थांबवल्यावारही फक्त प्रेक्षकांच्या आग्रहाखातर "आहिस्ता आहिस्ता " हि गझल सादर केली..चेहऱ्यावर कसलेही रागाचे,संतापाचे भाव नाहि.वेळेत संपवावं.   असा आग्रह नाहि.प्रेक्षकांचे आणि स्वतःचे संपूर्ण समाधान करण्यावर त्याचा भर..तो खरचं कलेचा पुजारी वाटला मला.कार्यक्रम संपूच नाहि असा वाटत होत..इतका तो यशस्वी होता...यशस्वी शब्दापेक्ष्याही जास्त यश खर तर त्याला भेटल होत.माझ स्वप्न पूर्ण झाल....सिंगापूर मध्ये ते शक्य झाला.याचा आनंद होताच.मनात समाधानहि होत.शेवटच्या गझलेला तर त्याच्या वादकांनी कमालच केली ...अफाट जुगलबंदी झाली...स्वर्गीय आनंद होता तो...संपूच नये असा वाटणारा,मधुर,अविस्मरणीय..सुखद..  क्षण!

Sunday 9 May 2010

दिवस ...

दिवस येतात...दिवस जातात.आठवणींचे शिंतोडे मागे मात्र सोडून जातात.घरासमोरच गवत मात्र..डोलात वाढत असतं...वाढणाऱ्या वयाची जाणीव  ते करून देत असत.डोळे उघडून पाहिलं तर सतत काहीतरी बदलत असत.आपण मुद्दाम पाहत नाही  म्हणून आपल्याला ते दिसतहि नाही.ऊन-पाऊस,वादळ-वारा..निसर्ग त्याचे खेळ चालू ठेवतो.आपण मात्र आयुष्याची सांगड घालण्यात  सदैव मग्न असतो..भरपूर प्रवास झाल्यावर अचानक लक्ष्यात येत...अरे..कधी झाल हे सगळ..काल तर आपण तिकडे होतो..काही काळ धक्का लागल्यासारख आपण जरी वागत असलो.तरी पुढच्याच क्षणी भूत आणि भविष्याशी सांगड मात्र घालता असतो.वर्तमानकाळ दुर्लक्षितासारखा बाजूला असला.. तरी रुसत मात्र नाही.कारण तोच  वेषांतर करत असतो...प्रत्येकाच्या मनात डोकावण्यासाठी.. 

Wednesday 5 May 2010

नातं..

मनामध्ये दरी पडल्या तर त्या भरून काढण फार अवघड असतं.लाकडाच्या फटी भूश्याने भरता येतात.पण मनात पडलेल्या फटी वेळीच भरल्या नाहीत तर त्या हळूहळू दरी बनत जातात.कुणाचं कुणाशी देण-घेण नसत.उरतो तो कोरडेपणा.आजकाल नात्यातला ओलावा सहसा दिसत नाही.दिसतात ती फक्त ओलं.ओलं म्हणजे दुरून डोंगर साजरा यापेक्ष्या वेगळ काही नाही.आहे त्यापेक्ष्या जे  नाहीये ते लपवण अवघड असतं.    नातं फार नाजूक असतं.म्हटलं तर कदाचित कापसापेक्ष्याहि मऊ आणि संवेदनशील असतात ती.त्यांना हळुवार जपण हीही एक कला आहे.बऱ्याचदा.. नात्यांमधे गैरसमजूतींचे शिडकावे होत असतात.त्याला वेळीच कोरडा करावा नाहीतर तो चिघळत जातो.आपण ठरवल तसा तो सोडवता येतो.प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय शोधतो. आणि तो शोधालाच पाहिजे.मला वाटत...

नातं म्हणजे ..
थोड तू समज ..
थोडा मी समजून घेते...
कांदा तू चीर...
फोडणी मी देते.

उगाच भांडलो गड्या.
थोडं समझुन घेऊया का?
का चिडलो?त्यावर..
चर्चा करूया का?

चीडचिडीने  काय होतं?
नुसतच बिपी वाढत...
पाऊस आलाय छान त्यात बेभान
होऊन भिजुयात का?

कुणाला का पाडाव मधे?
आयुष्य आपल्या दोघांच..
जरा..कटुता विसरून
एकमेकांना समजून घेऊया का?

पुन्हा एकदा चहा घेऊ,
मनसोक्त गप्पा मारू...
आठवणींची तार छेडून ..
समुद्रकिनारी जाऊया का?

आता

मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरीत लिहायचा बंद केलं.आता पेन कागद कमी  असतात   जवळ...त्याची जागा लॅपटॉपने घेतलीये.फिरून,चक्कर मारून...लिहिण आता बंद झाल.आता लिहिते फक्त तेव्हाच जेव्हा मेल्स चेक करते किंवा लॅपटॉप  जेव्हा सुरू असतो.नाहीतर .... सुचलेलही आता मी लिहित नाही.आता आई  नसते ओरडायला बस झालं म्हणून...आणि मीही लाडात येत नाही.आता वाचन हि  खूप  कमी झालये आणि लिहीनही.  आता पेन कोरडे झालेत आणि शाईहि तशीच आहे दौतीत.पानही तशीच आहेत.डाय्ररी रिक्त आहे.आता लिहायचं म्हणून ग्यॅलरीत बसत नाही.वेळ भेटला तरीही तो लिहायला नेहमीच वापरत नाही.कधीतरी लिहिते थोडाफार चुकल्यासारखं वाटतं म्हणून. आता..आता सारच बदललय मी आणि आयुष्यहि...आता मी जरा मोठी झालेय स्वीकारल आणि नाकारल तरीही...


Tuesday 4 May 2010

पाटी आणि ५ पैसे...


पाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटले.त्यावेळी खाऊसाठी ५ पैसे खूप होते.ते  मला भेटले ते या अटीवर कि माझा घरचा अभ्यास पूर्ण केल्यावरच मी खाऊ  आणावा.मीही आज्ञाधारक होतेच.होकार देऊन मी माझा अभ्यास पूर्ण करायला घेतला.पण तो करताना पैसे हरवू नये म्हणून मी ते पाटीच्या वरच्या कडेत ढकलले होते.अभ्यास पूर्ण झाल्यावर मला ते सापडलेच नाही.खूप शोधले तरीही.पाटी हलवल्यावर  ते कुठे तरी पडले असावे.मी वरच्या कडेत ढकलले पैसे सगळ्या कडांत शोधले.अगदी मागून-पुढून.पण काही सापडेना.शेवटी हैराण होऊन खेळायलाहि  न जाता मी पुन्हा अभ्यास करायला बसले.ते या आशेवर कि कदाचित ते पैसे कुठल्यातरी कडेने बाहेर येतील.बरेच दिवस उलटले, कित्येक महिने,वर्ष्य गेलीत.ते सापडले नाहीत .त्या नंतर कित्येकदा मला खाऊला पैसे भेटले कितीतरी पटीने जास्त.मी नवीन पाटीही घेतली होती...त्यातही शोधले...हे जाणून  होते कि त्यात सापडणार नाही.आजही पाटी दिसली कि मी त्या पाटीत  माझे ५ पैसे शोधते.अगदी कडा चाचपडून.हे माहित असूनही कि हि पाटी माझी नाही...आणि आता ते सापडणार नाहीत.

Monday 3 May 2010

हृदयी वेदना अन,
मुखी त्रास कश्याला?
मनी वंचनांचे,
फास कश्याला?
सावर-आवर तूच,
तुजला कारण...
कुणी न जेथे तुझे
तेथे आस कश्याला?


नको हवे तर ..
पाश कश्याला?
स्वाभिमानाची..
लाज कश्याला?
टोचतात जे घास घश्याला
मनी त्याचा हव्यास कश्याला?



मुक्त विहंगावे आकाशी,
ठेवुनी मधुमास गडे,
विसरुनी सारे किंतु-परंतु,
 उमले ओठी तेव्हा,
  हास्य गडे.

Pages